कोल्हापूर : ग्रामपंचायतीची थकबाकी राहिली म्हणून गावठाणामध्ये वीजखांब उभे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणकडून यापुढील काळात खांब उभारण्याचे भुईभाडे घ्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी सभेत करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील उपस्थित होतेे. ज्येष्ठ सदस्य अरूण इंगवले आणि राहुल आवाडे यांनी वीजखांबाचा विषय उपस्थित केला. यावर सभेत जोरदार चर्चा झाली. महावितरण जर अशी आडमुठी भूमिका घेणार असेल तर जिल्हा परिषदही तशीच भूमिका घेईल, असेही यावेळी सुनावण्यात आले.
‘नरेगा’च्या कामाबाबत बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असून, कागदी घोडे नाचवायचे काम अधिकारी करत आहेत. तुमचीच ग्रामसेवकांना फूस असल्यामुळे त्यांच्याकडूनही या योजनेतील कामे होत नाहीत. अन्य जिल्ह्यांमध्ये ही कामे मोठ्या प्रमाणावर होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातच का होत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अरूण इंगवले यांनी यावेळी ग्रामविकास मंत्री जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी काही तरी योजना मंजूर करून आणा, अशी सूचना केली.
चौकट
पदाधिकारी बदलाबाबत टोलेबाजी
इंगवले यांनी यावेळी पदाधिकारी बदलाचे काय झाले, अशी विचारणा यावेळी केली. तेव्हा उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी हा विषय पत्रिकेवरचा विषय नसल्याचे सांगितले. तेव्हा इंगवले यांनी हसतच जयवंतराव शिंपी यांना अहो यंदा तरी तुम्हाला काही संधी आहे का, असा चिमटा काढला. राहुल आवाडे यांनीही आम्ही तुमच्यासोबत असल्याचे शिंपी यांना सांगितले. या टोलेबाजीने स्थायी सभेतील वातावरण हलके झाले.