कसबा बावडा : पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले कसबा बावडा येथील पॅव्हेलियन कोविड सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरले असून, येथून आतापर्यंत तब्बल पाचशेच्यावर रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. योग्य उपचार पद्धती, योग्य रुग्णसेवा, वेळेवर रुग्णांना जेवण, नाश्त्याची सोय, सुसज्ज परिसर, परिसरातील स्वच्छता आणि प्रशासन गजानन बेडेकर यांचे योग्य पद्धतीचे नियोजन, या सर्व गोष्टींमुळेच हे शक्य झाले. या सेंटरमध्ये वयस्क रुग्णांची चांगली देखभाली केल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. या सेंटरमध्ये शंभरपैकी किमान ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील आहेत. त्यातच ज्येष्ठांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असल्याने ७५ ते ८० टक्के वयस्कर रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.
तरीही आजी झाल्या कोरोनामुक्त
या कोरोना सेंटरमध्ये भुयेवाडी येथील ९४ वर्षांच्या आजी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांचा एचआरसीटी २८/४० होता. मात्र, योग्य उपचारामुळे या आजी ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या. विशेष म्हणजे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्णही या सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. गजानन बेडेकर, सचिन कदम, प्रदीप उलपे हे या सेंटरमध्ये अहोरात्र झटत असल्यानेच हे सेंटर रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.