इचलकरंजी : येथील यंत्रमाग उद्योगात असलेली आर्थिक मंदी आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपावली सण होऊन आठवडा झाला तरी यंत्रमाग कारखाने अद्यापही बंद आहेत. पुढील आठवड्यापासून यंत्रमाग कारखाने सुरू होऊ लागतील. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे कारखान्याची एकच शिफ्ट चालू राहील आणि डिसेंबर महिन्यापासून कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी अपेक्षा यंत्रमागधारकांनी बोलून दाखवली.दीपावली सणाच्या आठवड्यामध्ये बोनस घेतल्यानंतर शहरातील यंत्रमाग कारखाने बंद होतात. सण झाल्यानंतर साधारणत: पुढील आठवड्यात शहरातील बहुतांशी यंत्रमाग कारखाने सुरू होऊ लागतात. त्याच्या अनुषंगाने सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट असेही कारखाने सुरू होतात. मात्र, यंत्रमाग उद्योगामध्ये गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर मंदीचे वातावरण असून, आर्थिक टंचाई भासत आहे. त्यामुळे दीपावली सणापूर्वीच चार ते पाच दिवस शहरातील यंत्रमाग कारखाने बंद झाले. दीपावली सण उलटला तरी कापडास मागणी नसल्यामुळे अद्यापही यंत्रमाग उद्योगात गडद मंदीचे सावट आहे. त्यातच नगरपालिका निवडणुकीचे वातावरण शहरात असल्यामुळे अद्यापही यंत्रमाग कारखाने सुरू झालेले नाहीत. मात्र, पुढील आठवड्यापासून सुमारे ४० ते ५० टक्के यंत्रमाग कारखाने आणि त्यानंतरच्या आठवड्यात ८० ते ९० टक्के यंत्रमाग कारखाने सुरू होतील, अशी चर्चा यंत्रमागधारकांमध्ये आहे. (प्रतिनिधी)रोजंदारी पद्धतीने मेळाव्यासाठी कामगारसद्य:स्थितीस नगरपालिका निवडणुकीचे वारे शहरात वाहत आहे. निवडणुकीसाठी उभे असलेल्या इच्छुक उमेदवारांना पदयात्रा, मेळावे अशा विविध कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. अलीकडील काळामध्ये निवडणूक कामासाठी रोजंदारी पद्धतीने महिला व पुरुष घेण्याची पद्धती अवलंबली जात आहे. अधिक कष्ट न करता पदयात्रांमधून फिरण्यासाठी चहा-नाश्त्याबरोबर रोजंदारी मिळते. प्रसंगी जेवणही दिले जाते. त्यामुळे या बाबींकडे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आकर्षित होतो. पालिका निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान असून, २८ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल लागणार आहे. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत बहुतांशी यंत्रमाग कारखाने सुरू झाले तरी त्यांची एकच शिफ्ट चालू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यातील १६ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय
By admin | Updated: November 9, 2016 00:20 IST