कोल्हापूर : ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ प्रश्नावर घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील वाहतूकदार संघटनांसमवेत संयुक्त बैठक घेऊ, अशी ग्वाही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
हमालीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माथाडी सल्लागार समितीसमवेत बैठक झाली. माथाडी कायद्यासंदर्भात यावेळी विस्तृत चर्चा झाली. हमाल पंचायतचे बाबा आढाव, माथाडी संघटनेचे नरेंद्र पाटील, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे सुभाष जाधव यांच्यासह कामगार आयुक्त सुरेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, बीड, हिंगोली, पुणे, औरंगाबाद, नगर, जालना, धुळे, वर्धा, नागपूर येथील माथाडी बोर्डाचे अध्यक्ष बैठकीत सहभागी झाले.
हमाल पंचायतचे बाबा आढाव यांनी पूर्वीप्रमाणेच हमालीची पद्धत चालू ठेवावी, अशी विनंती केली. माथाडी बोर्डाचे नरेंद्र पाटील यांनी मालट्रक वाहतूकदारांचे म्हणणे ऐकून घेण्याची आवश्यकता नाही, आमच्या बाजूने एकतर्फी निर्णय घ्या, असा आग्रह केला. यावर मंत्री मुश्रीफ यांनी कोणावरही अन्याय करता येणार नाही. सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे. विशेषत: मालट्रक वाहतूकदारांना कोणताही निर्णय घेताना विश्वासात घ्यावे लागेल, असे स्पष्ट करून यावर लवकर राज्याची बैठक घेऊ, असे जाहीर केले.