कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु धरणफुटीची सखोल चौकशी व्हावी, धरणाच्या पुनर्बांधणीसाठी आराखडा करून तो तातडीने शासनाकडे पाठवावा व नागरिकांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
आमदार पाटील यांनी शुक्रवारी येथील नागरिकांची भेट घेतली. त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, धरणासारख्या संवेदनशील विषयात प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. गेल्या ४ वर्षांपासून तलावाच्या जॅकवेलसह विरुद्ध बाजूलाही गळती सुरू असून, गेल्या २ ते ३ महिन्यांपासून देखरेखीसाठी साधा वॉचमनही याठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात कोणतीही खबरदारी घेतली नाही. हे धरण कोणत्या कारणाने फुटले याची सखोल चौकशी व्हावी, येथील शेतजमीन नापीक झाली असून, अशी जमीन पुन्हा उपयोगात आणण्यासाठी सरकारकडून एकरी १ लाख अनुदान मिळावे, नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे, या धरणफुटीमुळे शेतातील मोटार व पाइपलाइन वाहून गेली असल्यामुळे शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
---