रमेश सुतार
बुबनाळ :
कृष्णा नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावांमध्ये एसटी, पिकअप शेड नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ, प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
कृष्णा नदीपलीकडील सात गावे हे कर्नाटक राज्यालगत असल्याने या मार्गावरून प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावात एसटीचे पिकअप शेड नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे ऊन-पावसात प्रवाशांना फटका बसत आहे. प्रवाशांना मंदिरे, हॉटेल, झाडांचा आश्रय घेत एसटी पकडावी लागत आहे.
कवठेगुलंद माळावर आलास हद्दीतील बसथांबाही मोडकळीस आल्याने त्याचाही वापर करता येत नाही. तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी याकडे लक्ष देऊन राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
----------------
चौकट - नवीन बसथांब्याची गरज
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ नदीपलीकडील सात गावे असल्याने या मार्गावरून यात्रेकरूंची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. याचा विचार करता एसटी परिवहन विभागाने नवीन बसथांबा उभा करणे आवश्यक आहे.