लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : विनाकारण शहरात फिरणाऱ्या १९७० वाहनधारकांसह मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी शनिवारी दिवसभरात ४ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय २६३ वाहने जप्त केली. तर निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या २२ दुकानदारांवर गुन्हे नोंद झाले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात पोलीस प्रशासनाने तर २४ तास कंबर कसली आहे. शनिवारी दिवसभरात जिल्हाभरातील नाकाबंदीमधून पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या १९७० वाहनधारकांकडून ३ लाख ९८ हजार, मास्क न वापरणाऱ्या ४५४ जणांकडून ७७ हजार ९०० असा एकूण ४ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला. मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या २६३ जणांची वाहने जप्त केली.
बावीस दुकानदारांवर गुन्हे
लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २२ दुकानदारांविरोधात अकरानंतर दुकाने उघडी ठेवल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले. यात पंक्चर दुकान, वडापाव दुकान चालक, दुचाकी दुरुस्ती मेकॅनिक, फर्निचर दुकान, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेता, बेकरी चालक आदींचा समावेश आहे. ही कारवाई १८८ कलमानुसार झाली.