लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात लसींचा पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे शहरासाठी तातडीने अधिक प्रमाणात लसींचा पुरवठा करावा. १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
शहरातील विविध भागांत सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरात ४५ वर्षांवरील साधारणत: एक लाख ५ हजार ६३६ इतक्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १५ मेअखेर ४४ हजार ८७२ जणांना पहिला, तर तेरा हजार १४७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता उपलब्ध होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सहा केंद्रांद्वारे लसीकरण सुरू असल्याने गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. त्यासाठी लसींचा पुरवठा करावा. १८ ते ४४ या नागरिकांसाठी एकही लसीकरण केंद्र नाही, ते तातडीने सुरू करण्यात यावे. याशिवाय फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना लस देण्याची सोय करावी.
तसेच शहरातील सहा लसीकरण केंद्रांवरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची माहिती, लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट व सध्या किती प्रमाणात झाले, याची आकडेवारी स्वामी यांनी सादर केली. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनाही देण्यात आल्या आहेत.