लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पावसाळ्यात आंबा घाटात भूस्खलन झाल्यामुळे महिनाभरापासून आंबा घाटातील वाहतूक बंद आहे. टू-व्हीलर व चारचाकी हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे. आंबा व कोकण येथील पाऊस व धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर प्रसिद्ध आंबा घाट वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे गणपती सणात पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, गाईड आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. बॅंकांचे हप्ते कसे भरायचे? असा प्रश्न आंब्यातील रिसोर्टधारकांना पडला आहे. हॉटेल, रिसोर्ट बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे .
दोन वर्षे कोरोना महामारीमुळे व्यवसाय ठप्प आहे. राज्य शासनाने चालूवर्षी कोरोना नियम शिथिल केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात हॉटेल व इतर व्यवसाय सुरू होते. अचानक पावसाळ्यात ढगफुटी पाऊस व भूस्खलन झाल्यामुळे आंबा घाटात दोन मीटर डोंगरच रस्त्यावर आला. त्यामुळे कोकणात होणारी वाहतूक बंद झाली. पावसाळ्यात पाऊस, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आंबा, विशाळगड, पावनखिंड, केर्ले धबधबा आदी ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. पण यंदा घाट बंद असल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात पर्यटक फारसे फिरकले नाहीत. याचा फटका हॉटेल, रिसोर्ट, छोट्या-मोठ्या व्यवसायांवर झाला आहे. आंबा गावातील सर्व व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून आहेत. गणपतीच्या सणावेळीदेखील पर्यटक आले नाहीत. त्यामुळे एक महिना झाला व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे.