कोल्हापूर : महापालिकेची निवडणुक लढविण्यासाठी सर्वच प्रभागांत इच्छुक उमेदवारांमध्ये तरुण उच्च शिक्षितांची भाऊगर्दी असल्याचे सध्या दिसत आहे. इच्छुक म्हणून जे डिजिटल फलक लागले आहेत, त्यांतून हे चित्र पुढे आले आहे. या इच्छुकांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आणि ते निवडून आले तर महापालिकेच्या सभागृहाचा चेहराही नवीन होईल. मातब्बर उमेदवारांनी मात्र अजूनही आपले पत्ते खुले केलेले नाहीत.महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेससह भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेना असा चौरंगी सामना होणार, असे आताचे चित्र आहे. ताराराणी आघाडीला रोखण्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची गट्टी होऊ शकते. आता हे तिघेही स्वतंत्र लढत असले तरी उमेदवारी देतानाही त्यांच्यात अंतर्गत छुपी युती होणार आहे. या तिघांचेही लक्ष्य भाजप व ताराराणी आघाडी कुणाला उमेदवारी देते याकडे आहे. देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने महापालिका निवडणुकीतही काही प्रमाणात त्या पक्षाची हवा आहे. ताराराणी आघाडीबद्दलही उमेदवारांना उत्सुकता असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या आघाडीकडून होणारी आर्थिक मदत. भाजप व ताराराणीने आता १० : १० : ०५ असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात दहा लाख, नंतरच्या टप्प्यात आणखी दहा लाख व तो उमेदवार रेसमध्ये असेल तर आणखी पाच लाख देण्याचे नियोजन असल्याचे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पैशाशिवाय सत्तेचा वापर करून निवडून येण्यासाठीच्या ज्या जोडण्या असतात, त्या करणारी फळीही या आघाडीकडे आहे. त्यामुळे सध्या तरी पक्षापेक्षा ‘ताराराणी’कडून लढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बहुतांश विद्यमान नगरसेवक हे ताराराणी आघाडीकडून व तितकेच भाजपकडून रिंगणात उतरणार, हे दिसते आहे. आता जे भागाभागांत डिजिटल लागले आहेत, त्यांमध्ये तरुण कार्यकर्ते जास्त आहेत. महिलाही नवख्या आहेत. प्रत्येकाने आपले शिक्षण फलकावर आवर्जून घातले आहे. स्थानिक व बाहेरचा नगरसेवक याबद्दलचे भावनिक आवाहनही अनेक फलकांवर दिसते. प्रस्थापित राजकीय कुटुंबाशिवाय अन्य छोटे-मोठे व्यवसाय करणारेही इच्छुक अनेक ठिकाणी झळकले आहेत. निवडणुकीतील आघाड्यांची नेतेमंडळी नवख्या उच्च शिक्षितांना पसंती देणार की जुन्या कार्यकर्त्यांना देणार हे लवकरच कळेल.महापालिकेच्या राजकारणात तरुण व सुशिक्षितांचा टक्का वाढणार असेल तर ते चांगले लक्षण आहे, असे म्हणायला हरकत नाही. तरुण कार्यकर्ता उत्साही असतो; त्यामुळे त्यांचे आतापासूनच फलक लागलेले दिसतात. जुने लोक डावपेच करतात. समोर गणेशोत्सव आहे. आपण आतापासूनच उमेदवारी जाहीर केली तर खिसा सैल सोडावा लागेल, अशी त्यांना भीती आहे. शिवाय उमेदवारीसाठी सोयीनुसार दारे फिरणेही सुरू आहे. त्यामुळे त्यांचे डिजिटल फलक अद्याप लागलेले नाहीत. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला तरी प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कुणाला निवडून द्यावे यासंबंधीचे प्रबोधन मात्र कोणत्याच पातळीवर होताना दिसत नाही. त्याची जास्त गरज आहे. लोकजागृती नाही झाली तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांवर आपण वचक बसवू शकणार नाही.- प्रा. विलास रणसुभे, राजकीय अभ्यासकफोटोचीही गंमतअनेकांनी प्रभागातील किती लोक आपल्या पाठीशी आहेत, हे दाखविण्यासाठी तब्बल पन्नास-पन्नास लोकांचे फोटो डिजिटलवर प्रसिद्ध केले आहेत. निवडणुका अजून लांब आहेत व कुणाला दुखवायला नको म्हणून कुणी मागितले तर प्रत्येकजण फोटो देत आहेत. आजपर्यंत ज्यांचा साधा बँकेच्या पासबुकावरही कधी फोटो लागला नाही, त्यांचा फोटो चक्क चौकात झळकल्याने त्यांनाही त्याची गंमत वाटत आहे!
उच्च शिक्षित तरुणांची भाऊगर्दी !
By admin | Updated: August 31, 2015 00:15 IST