राजाराम लोंढे - कोल्हापूर -गुळाचा दर घसरला म्हणून गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय म्हणजे पाय दुखतोय म्हणून तो कापून टाकण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया जाणकार शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गुळाचा उत्पादनखर्च व मिळणाऱ्या दरामुळे हा व्यवसाय अडचणीत आला याबाबत दुमत नाही. याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर येणे गरजेचे आहे, पण गुऱ्हाळघरे बंद करून पुन्हा शेतकऱ्यांनाच त्याची धोंड बसणार आहे. बंदमुळे शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार असून आंदोलनाचा मार्ग चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया खुद्द शेतकऱ्यांमधूनच व्यक्त होऊ लागल्या आहेत. अचानक बंदमुळे गुऱ्हाळधारकाचा रोज किमान वीस हजारांचा तोटा होणार आहे. कामगारांची मजुरी अंगावर बसणार असून बारा दिवस बंद केलेतर लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याने काही शेतकऱ्यांनी आंदोलनातून अंग काढून घेतले आहे. गुळाच्या हमीभावाचा प्रश्न आजचा नाही, प्रत्येक वर्षी गुळाचे दर घसरले की हमीभावाचा प्रश्न उपस्थित केला जातो. दोन वर्षांपूर्वीही गुळाचे दर घसरल्यानंतर तत्कालीन पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुळाच्या दराबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, पण हे आश्वासन मंत्रालयातच विरले. त्यानंतर ही बैठक मंत्रिमहोदयही विसरले आणि शेतकरीही. यंदा पुन्हा गुळाच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. हमीभाव घेतल्याशिवाय गुऱ्हाळघरे सुरू न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे पण हा निर्णय गुऱ्हाळधारकांच्या अंगावर येण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ऊस दरासाठी शेतकरी संघटना आंदोलनाचे हत्यार हंगामापूर्वी उपसते. महिनाभर आंदोलन चालवत असताना ज्या क्षणाला शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे वाटते त्यावेळी तडजोडीची भूमिका घेतल्याने संघटनेच्या आंदोलनातून शेतकऱ्यांना तोट्यापेक्षा चार पैसे जादा मिळतात पण ‘गुऱ्हाळघरे बंद’ आंदोलनाचा मार्ग चुकल्याने यामध्ये शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार आहे. त्यावर अवलंबून असणारे अडते व व्यापारी यांना जराही फटका बसणार नाही. येथील गुळाचे मार्केट बंद झाले तर ते सांगली व कराड येथून गूळ खरेदी करून गुजरातला पाठवू शकतात.कोल्हापूर बाजार समितीत गुळाचा दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी जाणीवपूर्वक गुळाचे दर पाडत असल्याची त्यांची तक्रार त्याविरोधात शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरे बंद ठेवून आंदोलनाचा ‘यल्गार’ पुकारला आहे. गुळाला हमीभाव व दरातील चढउतार ही काही यावर्षी निर्माण झालेली समस्या नाही, तिच्या मुळाशी अनेक कारणे आहेत ती मांडणारी वृत्तमालिका आजपासून...संक्रांतीच्या तोंडावर चिमण्या थंडगुळाच्या हंगामातील १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात मकर संक्रांतीचा सण असल्याने देशभर गुळाला मोठी मागणी असते. या काळात सरासरी दरापेक्षा तीनशे ते चारशे रुपयांनी चढा दर मिळतो पण ऐन संक्रांतीच्या तोंडावरच गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्याने अधिकच नुकसान होणार आहे. राज्यात गेले महिनाभर मराठवाड्यातील दुष्काळ व त्यानंतर चार दिवसांपूर्वी खानदेशात झालेली गारपीट यामुळे तेथील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. राज्यशासनाने सगळे लक्ष या प्रश्नाकडे असल्याने कोल्हापूर जिल्ह्णापुरता मर्यादित असलेल्या गुळाच्या प्रश्नाबाबत शासन किती गांभीर्याने विचार करेल, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. गुळाचे दर पडल्याने धंदा परवडत नाही. शासनाने यामध्ये भाग घेतला पाहिजे, त्यासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. पण हंगामाच्या मध्यंतरीच गुऱ्हाळघरे बंद केली तर मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही गुऱ्हाळघरे सुरू ठेवणार पण संप मिटेपर्यंत बाजार समिती गूळ नेणार नाही.- रतन बापूसो पाटील (गुऱ्हाळमालक, वरणगे)
गुऱ्हाळबंद आंदोलनच चुकीचे
By admin | Updated: December 16, 2014 00:40 IST