शिरोळ : अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेला मोबाइल अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. खराब व नादुरुस्त मोबाइल ते परत दिलेले आहेत. ते पुन्हा परत घेण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. कोरोना काळात मृत्यू झालेल्या सेविकांच्या वारसांना शासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाही. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
जयसिंगपूर येथे शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेऊन आपल्या मागण्यांबाबत त्यांना साकडे घातले. नवीन व चांगल्या दर्जाचे क्षमतेचे आधुनिक मोबाइल अंगणवाडी सेविकांना मिळावेत. कोरोना काळात सेवा बजावत असताना चार सेविकांचा मृत्यू झाला. त्यांना शासनाकडून मिळणारी पन्नास लाख रुपयांची मदत पाठपुरावा करूनही मिळालेली नाही. यासह विविध मागण्यांचे निवेदन मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. शिष्टमंडळात अप्पा पाटील, जयश्री पाटील, शमा नदाफ, अंजली क्षीरसागर, दिलशाद नदाफ, सुनंदा कुराडे, मंगल गायकवाड उपस्थित होत्या.