रमेश पाटील
कसबा बावडा :
येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. दिलीप पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अत्यंत निकटवर्तीय, एकनिष्ठ व विश्वासू मानले जातात. त्यामुळे पाटील यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले असल्याची चर्चा आहे.
दिलीप पाटील हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. हातकणंगले तालुक्यात कारखान्याचे सर्वाधिक सभासद आहेत. यापूर्वी चेअरमनपदाचा राजीनामा दिलेले सर्जेराव माने हे हातकणंगले तालुक्यातीलच होते. त्यामुळे नवीन निवड करताना हातकणंगले तालुका डोळ्यासमोर ठेऊन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी पॅनलची उभारणी करताना माजी आमदार महादेवराव महाडिक हे प्रत्येक वेळी किमान सात ते आठ नवीन चेहऱ्यांना पॅनलमध्ये संधी देत असत. त्यामुळे एकदा संचालकपदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर पुढल्या निवडणुकीवेळी आपण पॅनलमध्ये असू किंवा नाही हे ठामपणे कुणालाच सांगता येत नसे. गेली वीस वर्षे सलग दिलीप पाटील व अन्य एक-दोन संचालक अपवाद वगळता अशी संधी कुणालाच मिळाली नाही.
येत्या काही महिन्यांतच राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला सामोरे जाताना विद्यमान चेअरमन अनुभवी, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असणे आवश्यक असल्यानेच महाडिक यांच्याकडून दिलीप पाटील यांना संधी दिली गेली. शिवाय हातकणंगले तालुक्यातील सभासदांचाही निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या दृष्टिकोणातून पाटील यांची वर्णी महत्त्वाची मानली जात आहे.
चौकट : मानेंच्या बदली पाटील
कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच चेअरमनपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना वयोमान आणि प्रकृतीमुळे आपणास जमत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. परंतु त्याचवेळी पुढील दिशा ज्या त्या वेळी ठरवली जाईल, असा सूचक इशाराही दिला होता. माने यांचा अनुभव पाहता निवडणुकीच्या तोंडावर तोडीस तोड माणूसच चेअरमनपदाच्या खुर्चीवर असणे गरजेचे वाटल्याने महादेवराव महाडिक यांनी दिलीप पाटील यांच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली.