लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच ३० टक्के पाणी साठले असून या प्रकल्पाच्या रूपाने उत्तूर विभागातील जनतेचे पांग फेडण्याची संधी परमेश्वराने आपणास दिली, अशी कृतज्ञतेची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे व अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला असून लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणीपूजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी गेल्या दहा वर्षात अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. आंबेओहळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे वचन आपण दिले होते. त्यासाठी सोमवारपासून महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून उर्वरित पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
यावेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे आदी उपस्थित होते.
महसूल, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार
‘आंबेओहळ’ प्रकल्पाचे काम गतीने व चिकाटीने पूर्ण केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे या अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापर सत्कार करून कौतुक केले.
दृष्टिक्षेपात ‘आंबेओहळ’प्रकल्प-
साठवणूक क्षमता - १२५० एमसीएफटी
सिंचनाखाली येणारी जमीन- ६ हजार हेक्टर
बंधाऱ्यांचे काम - सहा बंधारे पूर्ण, एकाचे अंतिम टप्प्यात काम
जमिनीची गरज - ३८ हेक्टर
जमिनीची मागणी करणारे शेतकरी- ३५
पॅकेजची मागणी करणारे शेतकरी -३१
फोटो ओळी -
१) आंबेओहळ प्रकल्पात यंदा पहिल्यांदाच पाणी साठवण्यात आले, याबद्दल उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे या अधिकाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. (फोटो-१८०६२०२१-कोल-आंबेओहळ०१)
२) आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पहिल्यांदाच ३० टक्के पाणी साठले आहे. (फोटो-१८०६२०२१-कोल-आंबेओहळ)