नंदकुमार ढेरे ल्ल चंदगड यावर्षीही दौलत आज-उद्या सुरू होणार, अशा केवळ घोषणाच हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्याबाबत कानी येत आहेत. दौलत या हंगामात सुरू होईल याकडे चंदगड तालुक्यातील सभासद, शेतकरी व कामगार आस लावून बसला आहे. मात्र, गळीत हंगामास प्रारंभ होऊन, जिल्ह्यातील अन्य साखर कारखाने सुरू होऊन दीड ते दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप दौलत सुरू होण्याबाबत काहीच हालचाली नसल्याने यावर्षीचाही हंगाम गेल्यात जमा आहे. मात्र, दौलतबाबत अद्यापही केवळ प्रयत्नच सुरू असल्याने दौलतचे भवितव्य सध्यातरी अंध:कारमय दिसत आहे. स्थानिक नेतेमंडळी दौलत चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दौलत चालू करण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज असून, सभासदांनीही पेटून उठण्याची गरज आहे. दौलत कारखान्यावर बेसुमार वाढलेल्या कर्जामुळे दौलत चालविण्यास घेण्यास कोणतीही पार्टी धजत नाही आहे. कर्जामुळे आज चौथ्या हंगामातही दौलत बंद आहे. दौलत कारखाना सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. दौलतबाबत केडीसीसीने ५०० हून अधिक वेळा चालवायला देण्याबाबत निविदा काढूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दौलतवरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस मोठा होत असल्याने चालवायला घ्यायला येणारे अनेकदा विचार करत आहेत. त्यात दौलत राजकारणाचा बळी ठरल्यामुळे येणारी पार्टी धजत नाही. तालुक्याच्या प्रमुख नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. जिल्हा बँकेच्या प्रयत्नांनाही अनेकदा यश न आल्याने चौथ्या हंगामातही दौलत बंद अवस्थेत आहे. एकेकाळी दौलत कारखान्यामध्ये नोकरी करणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. मात्र, दौलत म्हणजे खाबुगिरीचा अड्डा समजून तिच्यावर सत्ता भोगणाऱ्यांनी केवळ स्वत:चा विकास करून घेतला. दौलतकडे शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे, कामगारांचे थकीत पगार, परतीच्या बिनपरतीच्या ठेवी, शेअर्स रक्कम, आदी मोठ्या प्रमाणावर रकमा अडकल्या आहेत. दौलतची विक्री करून जवळपास साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रक्कम आली तरच सर्वांची देणी मिळू शकतील. सन २०११ ला साखर जप्त केल्याने शेतकऱ्यांचे ३४ कोटी रुपये अद्याप न्यायालयात अडकले आहेत. दौलत कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. तो सुरू करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील प्रमुख तीनही नेते, शेतकरी, कामगार व सभासदांची कारखान्यावर बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सर्वाधिकार मुश्रीफ यांना देण्यात आले. मात्र, त्यांचेही अद्याप प्रयत्नच सुरू आहेत. स्थानिक नेते नरसिंगराव पाटील, गोपाळ पाटील व भरमूअण्णा पाटील एकत्र आले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे दौलतचे घोंगडे अद्यापही भिजत आहे. दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीनेही दौलत चालवायला देण्याबाबत स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून उठाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचा नेत्यांवरील विश्वास उडाल्यामुळे कोणीही स्वत:च्या खिशातील पैसे द्यायला तयार आहे. जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यांनीच स्वत:च्या नावावर ठेवी ठेवून बँकेला ते तारण म्हणून देऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र याही प्रयत्नाला यश आले नाही. ‘दौलत’वर बराच काळ माजी आमदार नरसिंगराव पाटील यांची सत्ता होती. ते स्वत: नरसिंगराव पाटील चेअरमन असले तरी त्यांना आमदार व अन्य उच्च पदांची लॉटरी लागल्यामुळे त्यांचे कारखान्याकडे दुर्लक्ष झाले. कारखान्याचा वापर राजकीय अड्डा म्हणून केला. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये कारखान्याचा पैसा वापरला गेला. गचाळ व्यवस्थापनामुळे कारखाना रसातळाला गेला.
टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
४दौलत चालविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवे होते, त्यांनी पोटतिडकीने प्रयत्न केले नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पाचवेळा टेंडर झाली. कोणीही भरली नाहीत. हत्तीसारख्या फुगत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे यामध्ये टेंडरला प्रतिसाद मिळत नाही. दिवसेंदिवस कर्जाचा आकडा फुगत चालल्यामुळे टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ४दौलत सुरू होणार म्हणून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकरी, कामगार, तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांच्याच आशेवर पाणी पडले असून, दौलत सुरू होणे या केवळ घोषणाच ठरल्या आहेत.