(दीपक मेटील)
सडोली (खालसा) : कांडगाव, शेळकेवाडी, वाशी येथील कृषिपंपांना गेली दोन महिने कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कोथळी व कांडगाव महावितरणकडे तक्रार देऊनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असून ऐन उन्हाळ्यात पाणी उशाला असून पिके मात्र करपली जात आहेत. येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
भोगावती नदीवरील कांडगाव, वाशी, शेळकेवाडी या गावांतील कृषिपंपांना वाशी फिल्डअंतर्गत सहकारी संस्था व खासगी कृषिपंपधारकांना कोथळी महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून दिवसपाळीत या कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा सुरू असल्याने काही शेतकऱ्यांचे कृषिपंप जळाले आहेत. वारंवार हे सुरू असून, कृषिपंपांना आठ तासाऐवजी पाच तासच विद्युत पुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंपही मोकळेच फिरून जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वीजबिलात वाढ होत असल्याने यांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. गेली दोन महिने हा प्रकार सुरू असून कोथळी (ता. करवीर) येथील महावितरणच्या कार्यालयात तक्रार देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येत्या दोन दिवसांत या कृषिपंपांना उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृषिपंपधारकांनी केला आहे.
प्रतिक्रिया
कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होत असून यामुळे माझा कृषिपंप जळाला आहे. वारंवार महावितरण कार्यालयात तक्रार देऊनसुद्धा याकडे महावितरण दुर्लक्ष का करत आहे. या प्रकारामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’, अशी या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. तत्काळ उच्चक्षमतेने विद्युत पुरवठा करावा अन्यथा आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
जयदीप शेळके
शेळकेवाडी शेतकरी
प्रतिक्रिया 2
या परिसरात सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या जिवावरच अनेक शेतकरी अवलंबून असून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वारंवार वीज खंडित होत आहे. केवळ चार तासच वीजपुरवठा होत असल्याने पिके वाळू लागली आहेत, तर कृषिपंप जळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
रणजित पाटील
सचिव महालक्ष्मी सह. पाणीपुरवठा कळंबा, ता. करवीर.