कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, कार्यक्षेत्रातील गावांचे सरपंच आणि वन्यप्राणी अभ्यासकांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रामधील २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्र हे तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्याकरिता तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य यांना सल्ला देण्याकरिता तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समितीची कार्यकक्षा फक्त तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रापुरती मर्यादित राहणार आहे. राखीव क्षेत्राचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याकरिता ही समिती प्रस्ताव व सूचना पाठवेल. वनविषयक कायद्यांचा भंग होणार नाही याबाबत समिती मार्गदर्शन करणार आहे.
चौकट
अशी आहे समिती
अध्यक्ष..उपवनसंरक्षक सावंतवाडी,
सदस्य सचिव..वनक्षेत्रपाल दोडामार्ग,
सदस्य..सरपंच कोनाळ, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मेढे, हेवाळे, ग्रामपंचायत सदस्य हेवाळे, बांबर्डे घाटीवडे, वन्यप्राणी अभ्यासक गिरीश पंजाबी, रमण कुलकर्णी, नागेश दप्तरदार, अनुपम कांबळी, पदसिद्ध सदस्य.. तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग, तालुका पशुधन विकास अधिकारी दोडामार्ग