कोल्हापूर : स्वयंपाकघरातील फोडणीकरिता अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलांचे दर गेल्या महिन्याभरात चार ते पाच रुपयांनी उतरल्यामुळे फोडणीचा ठसका किंचितसा कमी झाला आहे. गेल्या वर्षभरात ज्या गतीने खाद्यतेलांचे दर वाढले, त्या प्रमाणात दर कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. नागरिकांच्या किराणा खर्चात काहीसा फरक पडला असला, तरी १२५ ते १३० रुपयांपर्यंत दर खाली येतील, ही अपेक्षा पूर्ण होणे अशक्य आहे.
तेलबियांचे झालेले कमी उत्पादन आणि अतिवृष्टी यामुळे दोन वर्षांत संपूर्ण देशभरात खाद्यतेलाचे उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम स्वयंपाकगृहातील तेलाच्या फोडणीवर, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर झाला. वर्षभरात सर्व प्रकारच्या तेलांच्या किमती या जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. आता दर काहीसे कमी होताना पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने दोन वेळा खाद्यतेलावरील आयात कर कमी केल्याचा हा परिणाम आहे, पण सर्वसामान्य नागरिकांना प्रति किलो १२५ ते १३० रुपयांपर्यंत तेलांचे दर खाली येतील, अशी भाबडी आशा लागून राहिली आहे.
तेलाचे दर (प्रति किलो)
तेलाचा प्रकार ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १६८ १६२
सरकी १६४ १६०
शेंगदाणा तेल १८६ १८२
सूर्यफुल १८६ १८२
पामतेल १५५ १५०
किराणा खर्चात बचत -
कोट १.
खाद्यतेलाच्या किमती अचानक वर गेल्या. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले. महिन्याच्या खर्चात वाढ झाली. आता दर कमी होत असले, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात दर असायला पाहिजेत.
उषा पाटील.
कोट २.
तेलाचे दर दुपटीने वाढल्याने गोरगरिबांना परवडत नाही. किराणावरील खर्च वाढल्याने, रोजच्या खाण्यातील तेलाचा वापर कमी करावा लागला. आता दर कमी होत आहेत, ही एक समाधानाची गोष्ट असली, तरी १५०च्या आत दर आले पाहिजेत.
भारती माने.
म्हणून दर कमी झाले-
केंद्र सरकारने बाजारातील तेलांचे दर नियंत्रित ठेवण्याकरिता दोन वेळा आयात शुल्कात कपात केली, त्यामुळे दर कमी होत आहेत. सरकार अजूनही आयात शुल्कात कपात करील अशी अपेक्षा आहे. जर तसे झाले, तर आणखी दर उतरतील.
केतन तवटे, लक्ष्मी ऑइल मिल.