कोल्हापूर : छोट्या-छोट्या गोष्टींतून पाण्याचा थेंब अन् थेंब कसा वाचविता येईल यासंबंधीच्या उपाय-योजनांवर सोमवारी ‘लोकमत’च्या कार्यालयात झालेल्या ‘जलमित्र अभियाना’च्या पहिल्याच बैठकीत चर्चा झाली. कोल्हापूर हॉटेल मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ही बैठक झाली. ‘लोकमत’चे हे अभियान समाजोपयोगी असून त्यास आमचे सर्व पातळ््यांवर पाठबळ राहील, अशी ग्वाही हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी दिली.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना पाणी बचतीचे महत्त्व समजून सांगण्यासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र हे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान कोल्हापुरातही राबविण्यासाठी नियोजनाची बैठक ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात झाली. त्यामध्ये ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी अभियानाची माहिती दिली.बैठकीस नागेशकर यांच्यासह हॉटेल व्यावसायिक सचिन शानभाग, पल्लवी कोरगावकर, जयवंत पुरेकर, अरुण चोपदार उपस्थित होते. दैनंदिन व्यवहारात पाण्याचा वापर हॉटेलमध्ये जास्त होतो, म्हणून त्या घटकांमध्ये यासंबंधीची जागृती व्हावी यासाठीच अभियानाची सुरुवात हॉटेल व्यावसायिकांपासून करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली. पुढच्या टप्प्यात अन्य विविध संस्था, संघटनांनाही या अभियानामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विषय मुलांमध्ये गेला पाहिजे. यासाठी या अभियानाला जोडून निबंध स्पर्धाही घेतल्या जाव्यात. त्यातून मुलांमध्ये त्याबद्दल नक्कीच जागृती तयार होते. मुलांना पाणी बचतीचे महत्त्व पटले तर ते पालकांनाही त्याबद्दल आग्रह धरतात, असा अनुभव आहे. पाणी बचतीबद्दल जागृती करण्याचे काम हे मोलाचे आहे. त्याची सुरुवात मार्चपासूनच व्हावी व ती प्रतिवर्षी व्हावी. जेवढी निसर्गाची जोपासना करू, तेवढा कमी दुष्काळ व पाणीटंचाईचे चटके बसतील हे लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे. - पल्लवी कोरगावकरपाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर करण्याबाबत विचार व्हावा. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानातून पाणी कसे वाचविता येईल यासंबंधीची माहिती देणारी छोटी-छोटी स्टीकर्स मेनूकार्डपासून ते वॉश बेसीन, बाथरूमजवळ लावता येतील. त्यातूनही लोकांमध्ये जागृती होऊ शकेल. - उज्ज्वल नागेशकरकमोडच्या शौचालयामध्ये पाण्याचा जास्त वापर होतो. तो कमी करण्यासाठी कमोडमध्ये पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्यास तुलनेत कमी पाणी लागते. शौचालये स्वच्छ होण्यात अडचण येत नाही. वॉश बेसिनचा व्हॉल्व्हही भांडी स्वच्छ करताना महिला चालूच ठेवतात. त्यासाठीही या कॉकमधून पाणी कमी येईल अशी व्यवस्था करावी. बादलीत पाणी घेऊनच भांडी स्वच्छ करण्याचा पर्याय पाणी बचत करू शकतो. - जयवंत पुरेकर
थेंब अन् थेंब वाचविला पाहिजे
By admin | Updated: May 10, 2016 02:33 IST