लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार एकमेकाकडे बोटे दाखवून चेष्टा करत आहे. आरक्षणाविना समाज अस्वस्थ असताना मी आक्रमक व्हायचे नाही का, असा सवाल खा. संभाजीराजे यांनी केला. सध्या तरी संयमाने कायदेशीर मार्गाने लढा सुरू करायचा आहे, वेळप्रसंगी दखल घेतली नाही तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कोल्हापूर शहरातील तालीम संस्थांचे प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवाल नाकारला आहे, आता पुढे काय करावे लागेल, याची समाजासोबत चर्चा करायची आहे. रस्त्यावरील आंदोलन लगेच उभारता येईल. मात्र, त्यातून जनतेला वेठीस धरायचे नाही. आम्हाला आंदोलन करायला सांगून मजा बघणारे कोण आहेत, हे तुम्हालाही माहिती आहेत. आरक्षणाबाबत अधिकार कोणाचे यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये ढकलाढकली सुरू आहे. केंद्र सरकार पुनर्याचिका दाखल करणार आहे. न्यायालयीन लढाईला दोन दिवसांत यश येणार नाही. तोपर्यंत राज्याच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या प्राधान्याने केल्या पाहिजेत. ‘सारथी’, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाला बळकटी दिली पाहिजे. समाजाच्या भावना आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे. त्यांनीच मार्ग सांगावा, यासाठी भेट घेणार आहे.
यावेळी विविध संघटना, मंडळांनी संभाजीराजेंना पाठिंब्याची पत्रे दिली. फत्तेसिंह सावंत, निवास साळाेखे, दिलीप देसाई, महेश जाधव, प्रमोद पाटील, अजित राऊत, बाबा पार्टे, सुजित चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम जरग, सुरेश जरग, अजित खराडे, इंद्रजित बोंद्रे, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
अराजकीय लढा उभारायचा
न्यायमूर्ती भोसले समिती यावर अभ्यास करत आहे, तोपर्यंत आम्ही गप्प बसायचे का, भविष्यातील दिशा काय असावी, यासाठी समाजाबरोबर चर्चा करत आहे. तीन दिवसांत बहुतांश जिल्ह्यांत जाणार आहे. कोणत्याही पक्षाचा आम्हाला द्वेष नाही. हा सगळा अराजकीय लढा असेल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
मुळीक, इंद्रजित सावंत यांनी दुकाने बंद करावीत
संपूर्ण राज्यात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा उभारत आहे. कोल्हापुरातही शिवाजी मंदीर हे लढ्याचे केंद्र असेल, वसंत मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांनी आपली दुकाने बंद करावीत, अन्यथा आम्हाला बंद करावी लागतील, असा इशारा महेश जाधव यांनी दिला.
हात जोडणं लय झालं, हिसका दाखवूया
मराठा आरक्षणाबाबत नमस्कार, चमत्कार खूप झाले. आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. विधानसभेत ८० टक्के मराठा आमदार असताना ते गप्प का आहेत? समाजाच्या वेदना त्यांना समजत नाहीत का? हात जोडणे लय झाले, हिसका दाखवूया, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.