कागल :
कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा येणार हे गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे. राज्यात दोन रुग्णांचा आकडा २४ तासांत चौपट म्हणजे आठ हजारांवर पोहोचला आहे. असे असूनही बहुसंख्य लोक गांभीर्याने घेत नाहीत. आता येणारा हा कोरोना अधिक वेगाने पसरणारा आहे. मास्क हेच खरे हत्यार आपल्याकडे असल्याने बाबांनो, कृपया मास्क वापरा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यात्रा माहींवरही कडक निर्बंध आणा, मास्क न वापरण्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
येथील डी. आर. माने महाविद्यालयात शनिवारी कागल तालुक्याची कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुनीता पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, डाॅ. अभिजित शिंदे, प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले की, तालुक्यात सध्या चार रुग्ण आहेत. कागलचे कोरोना रुग्णालय सुरू आहे. यावर मंत्री मुश्रीफ यांनी संभाव्य परिस्थिती गृहीत धरून यंत्रणा सज्ज करावी. प्रवीण काळबर, नितीन दिंडे, गंगाराम शेवडे, सौरभ पाटील, विवेक लोटे यांनी सूचना केल्या.
चौकट
लसीकरणाबद्दल गैरसमज नकोत
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सध्या कोरोना प्रतिबंधक लस कोरोना योद्धयांना दिली जात आहे, पण प्रतिसाद कमी आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदी अधिकारीवर्गाने ही लस घेतली आहे. कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत. तेव्हा गैरसमज करून न घेता लसीकरण पूर्ण करून घ्यावे. म्हणजे पन्नास वर्षांपुढील लोकांना लस देणे सुरू करता येईल.