किणी : वारणा नदीत मगरींचा, तर शेतामध्ये तरसाचा वावर असतानाच, आता गावात गव्यांचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारणा नदी बारमाही दुथडी भरून वाहत असल्याने बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे शेतीला वीजपंपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी नदीकाठावर मोठ्या संख्येने विद्युत मोटारपंप बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा सुरू असताना शेतकऱ्यांना विद्युत मोटारपंप सुरू करण्यासाठी नदीकाठाला व शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यातच ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने रात्रीच्या वेळेस ऊस भरणीसाठी वाहन आले तर मजुरांना व शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र अधीच वारणा नदीत मगरींचा वावर आहे. गेल्यावर्षी तरसाचा वावर होता. तरसाने चावरे येथील शेतामधील शेळ्यांवर हल्ला केला होता. किणी येथे मगरीची पिली नदीकाठच्या ओघळीत सापडली होती. त्यांना तरुणांनी व वन विभागाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले होते. मगर, तरसासह आता गव्यांचा वावर आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी शेतात जाताना दोनहून अधिकजणांनी काठी आणि रात्री बॅटरी घेऊन जावे. गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये. ते बिथरण्याची शक्यता असते. गवे दिसल्यावर सतर्क राहून वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाकडून केले आहे.