काेल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सध्या खरीप पिकांना पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
गेली आठ-दहा दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके अडचणीत आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांची भांगलण, कोळपणसारखी आंतरमशागतीची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पिकांना पावसाची गरज आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासून मात्र कडकडीत ऊन राहिले. दुपारी कोल्हापूर शहराच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण काही काळ राहिले, मात्र त्याचे पावसात रुपांतर झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप राहिली आहे. नद्यांची पातळी कमी होत असून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.