गणपती कोळी --कुरूंदवाड --श्री क्षेत्र नृसिंहवाडी कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी राज्य शासनाकडून १२१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे़ भाविक व पर्यटकांच्या सेवा सुविधा व तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी खर्च केला जाणार आहे़ कन्यागत निमित्ताने भाविकांसाठी दत्त दर्शन जितके महत्त्वाचे असते़ तितकेच येथील कृष्णा नदीपात्रातील स्नानाला महत्त्व आहे़ मात्र, नदीतील पाणी प्रदूषित व जलपर्णीमय झाल्याने नदीच्या स्वच्छतेसाठीही विशेष निधी उपलब्ध होण्याची गरज आहे़दर १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकाल येतो़ ११ आॅगस्टपासून या पर्वकाळाला सुरुवात होणार आहे़ या काळात दत्त दर्शन व नदीस्नान पवित्र मानले जात असल्याने महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून भाविक, पर्यटक श्री क्षेत्र नृसिंहवाडीला येतात़ शासनाने पर्यटक व भाविकांचा ओढा लक्षात घेऊन राज्य शासनाने पर्यटक व भाविकांच्या सेवा-सुविधांसाठी व विकासासाठी पर्यटकांसाठी निवासस्थान, पार्किंग व्यवस्था, वाहतुकीची सुविधा, गौरवाडमधील अमरेश्वर मंदिर, गणेशवाडीचे गणेश मंदिर, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद येथील प्राचीन मंदिरे, खिद्रापूरचे पुरातत्त्व कोपेश्वर मंदिर यांचाही विकास या निधीच्या माध्यमातून करून पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे़भाविकांसाठी दत्त दर्शनाबरोबर कृष्णेमधील स्नानाला अधिक महत्त्व आहे़ दर्शनासाठी जाण्याआधी भाविकांकडून स्नान केले जाते़ मात्र, पंचगंगेबरोबर कृष्णा नदीही दूषित झाली आहे़ नदीपात्रात औद्योगिकीकरणाचे, शहराचे सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने पाण्याला उग्र वास येत आहे़ जलपर्णीने तर विळखाच घातला आहे़ कन्यागतच्या निमित्ताने भाविकांचे निवासस्थान, पार्किंग, वाहतुकीची सेवा, संरक्षण, आदी सेवा दिल्या जात आहेत. मात्र, याबरोबरच नदी स्वच्छ ठेवून प्रदूषण कमी करण्याबरोबरच जलपर्णी हटविण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करण्याची गरज आहे़ भाविकांना इतर सुविधांबरोबर आरोग्यही महत्त्वाचे असल्याने नदी शुद्धिकरणासाठी स्वतंत्र निधी मिळणे गरजेचे आहे़
‘कृष्णे’ची विशेष निधीतून स्वच्छता व्हावी
By admin | Updated: May 13, 2016 00:52 IST