शहरामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचला आहे. महानगरपालिका आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील कचरा व गाळ उठाव करून औषधफवारणी व धूरफवारणी करण्यात येत आहे. गुरुवारी पुणे महानगरपालिकेचे दोन फायर फायटर व ३६ कर्मचारी, बृन्हमुंबई महानगरपालिका कर्मचारी, देवस्थान समितीचे ४० कर्मचारी व केडीएमजी संस्थेचे १०० स्वयंसेवक, राष्ट्रवादी बचत गटाचे कार्यकर्ते, स्व. संघ जनकल्याण समिती व अवनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने शहरातील पूर ओसरलेल्या ठिकाणी साचलेला गाळ व कचरा उठाव करण्यात आला.
- कर्मचाऱ्यांची दहा तासांची ड्यूटी -
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची ड्यूटी नेहमी आठ तासांची असते; परंतु अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ साचला असल्याने तो उचलण्याकरिता कर्मचाऱ्यांची ड्यूटी दहा तासांची करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता सुरू होणारे काम सायंकाळी ५ वाजता थांबते. भरपावसातही काम सुरू राहते. पावसाची उघडीप मिळाली, तर काम अधिक गतीने होते, असे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितले.
पुणे, मुंबई, नवी मुंबई महापालिकेचा सहभाग-
कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुणे, मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत असून, महापालिका प्रशासनाने त्यांचे दोन जेट कम सक्शन मशीन, दोन फायर टेंडर, पाण्याचे १७ टँकरही पाठविले आहेत. प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी त्या- त्या महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून ही मदत पाठविण्याचे आवाहन केले होते.
- अशी यंत्रणा काम करतेय -
महास्वच्छता मोहिमेत १२ जेसीबी, १४ डम्पर, २७ ट्रॅक्टर, सहा फायर टेंडर, औषध फवारणीचे सहा ट्रॅक्टर, १३ फॉगिंग मशीन, १०० स्प्रे पंप, शिर्डी संस्थानच्या निधीतून घेतलेल्या तीन धूरफवारणी मशीन, अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना गमबूट, हँडग्लोव्हज, मास्क, रेनकोट देण्यात आले आहेत. मोहिमेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणीही केली जात आहे.