कोल्हापूर प्रशासनाने वारंवार सांगूनही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. परिणामी या सर्वांकडून प्रशासनाने तब्बल ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर हा संसर्गाद्वारे होणारा आजार असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात अनेकांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र हळूहळू जसे लॉकडाऊन वाढत जाईल तसतसे नागरिकांचा संयम सुटला. आॅक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाचा कहर कमी झाला होता. त्यामुळे मास्क वगळता अन्य बंधने नव्हती. मात्र उर्वरित वर्षभरासाठी अनेक बंधने लादल्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी अनेक बंधने झुगारली.
या सगळ्याच परिणाम म्हणजे प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली. संचारबंदी जाहीर झाली असताना विनाकारण वाहनांवरून फिरणे, वाहन चालक परवाना नसणे, मंडईत मास्क न लावता भाजी विक्रीसाठी बसणे, रस्त्यांवर मास्क न वापरता फिरणे, विनापरवाना दुकाने उघडणे, विवाह समारंभांचे आयोजन करणे अशासारख्या अनेक नियमांचा भंग केल्याप्रकरणी विविध पातळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी केलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल २ लाख ५० हजार ९०२ प्रकरणांमध्ये ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना गांभिर्याने घेतल्या नसल्याचेच हे द्योतक आहे. पोलिसांनी तर ज्या वेळी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली तेव्हा गाडीवरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करून लॉकडाऊन उठल्यानंतर परत केल्या होत्या. एवढे असूनही अनेकजण घरात बसत नाहीत हे वास्तव आहे.
चौकट
स्थानिक स्वराज्य संस्था, विभाग एकूण प्रकरणे वसूल दंड
महानगरपालिका २७,१४३ १ कोटी ७२ लाख ३१ हजार ८३५
ग्रामपंचायतींमार्फत १४,५२६ ३२ लाख ९० हजार ५५०
पोलीस विभाग १, ९२, ४१९ २ कोटी ९८ लाख ८६ हजार ८७०
नगरपालिका १६७१३ ३५ लाख ८९ हजार १२०
एकूण ७१८२६/१,७९,०७६ ५ कोटी ३९ लाख ९८ हजार ३७५