भुये व भुयेवाडी गावातून राज्य मार्ग १९४ हा रस्ता कार्यरत आहे.सध्या प्रस्तावित असलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग १६६, रिंग रोड, कोकण रेल्वे, सुंदर जोतिबा विकास योजनेंतर्गतचा रस्ता, प्राधिकरणातही या दोन गावांचा समावेश आहे. यामुळे ही दोन्ही गावे भविष्यात शहरात येणार आहेत. यामुळे या गावातील मुख्य व्यवसाय शेती अडचणीत येणार आहे.याशिवाय लाखमोलाची घरे, नैसर्गिक जलस्त्रोत असणाऱ्या विहिरी, बोअरवेल नष्ट होणार आहे. शिवाय ओढे, नाले, ओघळ या नैसर्गिक स्त्रोतांची स्थळ पाहणीच केली गेलेली नाही. राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुयेवाडी-भुये या दोन गावांना नामशेष करण्याचा भूशास्त्रज्ञ अभिजित पाटील यांनी आरोप केला आहे.
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे वारणानगर कोडोली ते वाठार असा असताना तो केर्ली भुये शिये या दाट लोकवस्तीच्या भागातून करण्यात आला आहे तर कोकण रेल्वे ही याच पट्ट्यातून जाणार असणार असल्याने या गावच्या शेती व स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान होणार आहे. सुंदर जोतिबा या योजनेतील रस्ताही याच गावातून प्रस्तावित आहे.या शिवाय प्राधिकरणात या दोन्ही गावांचा समावेश असल्याने या गावांची ओळख पुसली जाण्याची भीती आहे.