कदमवाडी - कर्तव्य बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील १५ जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करून घेतले आहे. संबंधितांना याबाबतचे नियुक्ती पत्र पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते देण्यात आले.
पोलीस दलात सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी सेवा बजावताना मृत्यू झाला. त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी मिळावी यासाठी अर्ज केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पोलीस दलातील अशा मृत्यू झालेल्या पाल्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर पोलीस दलातील १५ पैकी १२ जणांची नियुक्ती गुरुवारी झाली आहे. पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील १२ जणांना शिपाईपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपा तत्त्वाखाली शासकीय सेवेत लवकर नोकरी मिळणे तसे खूप कठीण आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलास मिळाला आहे. कोल्हापूर पोलीस दलाने या भरतीच्या निर्णयाबाबत तत्परता दाखवली आणि पोलीस कुटुंबातील १२ जण आज पोलीस दलात रुजू झाले आहेत. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या सर्वांना सेवा बजावण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. मात्र सध्या कोरोना काळात याचे प्रशिक्षण लांबणीवर जाणार आहे.
फोटो - कोल्हापूर पोलीस दलातील १५ पैकी १२ जणांची अनुकंपा भरती गुरुवारी झाली. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांना पोलीस पेटी व साहित्य देण्यात आले.
(छाया-दीपक जाधव )