जयसिंगपूर : ‘आंदोलन अंकुश’कडे तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागे वीजबिलाचा तगादा लावणार नाही, शिवाय तक्रारीचे निवारण होत नाही तोपर्यंत वीज जोडणी तोडणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जयसिंगपुरातील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी दिली. वीजबिलाची वसुली करताना महावितरणकडून ग्राहकांना दमदाटी केली जात आहे. अवास्तव व चुकीची बिले दुरुस्त न करताच ती भरण्यासाठी ग्राहकांच्या मागे तगादा लावला जात आहे. वीज जोडणी तोडण्याचीही धमकी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आंदोलन अंकुशने जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.
यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व महावितरणचे अधिकारी यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. ज्या ग्राहकांनी आंदोलन अंकुशकडे तक्रारी दिल्या आहेत, त्यांनी जानेवारीअखेर थकीत वीजबिल भरु नये. या तक्रारींवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वीज जोडणी तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन महावितरणने दिल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.