राजाराम लोंढे --कोल्हापूर -देशात धवलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवलेल्या ‘अमूल’ने आता मऱ्हाटी मुलुखात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने राज्यातील दूध उद्योग ढवळून निघत आहे. शुगरबेल्ट असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातच मिल्कबेल्ट सर्वाधिक विकसित झाला असला तरी ‘अमूल’च्या तगड्या आव्हानामुळे दूध संघांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.‘अमूल’ने राज्यात १९९३ साली मुंबईत प्रथम पाऊल ठेवले. सध्या मुंबईसह पुणे, अहमदनगर, धुळे येथे रोज सव्वाचार लाख लीटर दूधसंकलन, तर तब्बल १६ लाख लिटरची विक्री सुरू आहे. आगामी काळात सात प्लॅँटच्या माध्यमातून महाराष्ट्र काबीज करण्याची व्यूहरचना त्यांनी आखली आहे. त्यातूनच राज्यातील सहकारी व खासगी दूध उद्योगाच्या दारात तीव्र स्पर्धा येऊन ठेपली आहे. सध्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या वेगाने वाढणाऱ्या शहरांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी नागपूर येथे दोन लाख लिटर क्षमतेचा प्लॅँट घेतला आहे. खेड-पुणे येथे १० एकर जागा घेतली असून, येत्या दोन वर्षांत १० लाख क्षमतेचा प्लॅँट चालू करण्याचे नियोजन आहे. इगलो-मुंबई येथे केमिकल फॅक्टरीमध्ये चार लाख लिटर क्षमतेचा दूध प्लॅँट तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच मिल्कबेल्ट असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणीही घुसण्याची त्यांची तयारी सुरू आहे. कोल्हापुरातील ‘गोकुळ’ वगळता येथे आव्हान पेलू शकणारा एकही संघ सध्यातरी दिसत नाही. ‘मयूर’, ‘महालक्ष्मी’सह इतर बंद संघ ताब्यात घेण्याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. धास्तीचे मूळ गैरव्यवस्थापनात राजकीय व्यवस्थेनेच सहकारातील त्रिस्तरीय यंत्रणा संपविल्याने एकाच जिल्ह्यात चार-पाच तालुका संघ कार्यरत झाले. त्यात गैरव्यवस्थापनामुळे बहुतांश बंदही पडले. ‘गोकुळ’ वगळता एकाही संघाने उत्तम पशुखाद्य, उत्पादकांना वेळेत पैसे, आधुनिक संकलन व्यवस्था, जातिवंत जनावरांची पैदास यामध्ये भरीव काम केलेले नाही. त्यामुळे सर्वच दूध संघांना‘अमूल’ची धास्ती वाटू लागली आहे. गाईचे दूध ३२ रुपये !मुंबई मार्केटमध्ये इतर संघ गाईचे दूध ४० रुपये प्रतिलिटरने विक्री करतात; पण ‘अमूल’ १ लिटरची पिशवी ३२ रुपये प्रतिलिटरने विक्री करते. मार्केटमधील स्पर्धकाला कशा प्रकारे संपवायचे, याचे तंत्र त्यांच्याकडे आहे.
अमूलची ‘मस्ती’, साखरपट्ट्यात धास्ती!
By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST