कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा केशवराव भोसले नाट्यगृहात येत्या आठ दिवसांत जनतेसमोर सादर करण्यात येणार आहे. आराखड्यातील त्रुटी, सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर तयार होणारा सर्वमान्य असा पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देऊ, असे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी बैठकीत सांगितले. येथील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा पर्यटन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी मंत्री पाटील होते. खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा ७२ कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यात शासन २५ कोटी देण्यास तयार आहे. त्यासाठी आराखडा करताना मंदिर आणि भाविक यांना केंद्रबिंदू मानण्यात येईल. मंदिर परिसर विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी जनतेची मते आजमावणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये व्यापक बैठक घेऊन लोकप्रतिनिधी, जनता यांची सूचना विचारात घेतल्या जातील. त्यानंतरच आराखड्यास अंतिम मान्यता दिली जाईल. वाडीरत्नागिरीतील श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा १५५ कोटींचा आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यामधून दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, वाहनतळ, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची कामे करण्यात येतील. माणगाव परिसर विकास आराखडा १०० कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटींच्या आराखड्यात प्रवेशद्वारे, भव्य स्मारक, तलाव विकास, शाळा इमारत विकास, मैदान विकास, आदी कामांचा समावेश आहे. निधी उपलब्ध होताच कामे सुरू होतील.जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत करून बैठकीतील विषय सांगितले. आमदार सतेज पाटील,आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांंच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आमदार, खासदारांनी आराखड्यासंबंधी विविध सूचना मांडल्या. (प्रतिनिधी) शाहू महाराज जन्मस्थळबैठकीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विकास आराखडा यावर सविस्तरपणे चर्चा झाली. संग्रहालयाचा एकूण १५ कोटींपैकी ६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३ ते ४ कोटींची कामे सुरू करण्याची सूचना मंत्री पाटील यांनी दिली. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी १२१ कोटींच्या आराखड्यातील कामे प्राधान्याने गतीने करण्याची सूचनाही त्यांनी दिली.दोन दरवाजा बंदचा प्रस्तावअंबाबाई मंदिरात जाण्यासाठी सध्या चार दरवाजे आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून दोन दरवाजे बंद करण्याच्या प्रस्तावाचा आराखड्यात समावेश करावा, असे प्रशासनाने सुचविले. मात्र, यावर जनतेच्या तक्रारी, सूचना विचारात घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. वाहनतळासाठी जागा निश्चितीवर एकमत झालेले नाही. महापालिकेच्या मदतीने जागा निश्चित करून आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.
‘अंबाबाई’ आराखडा जनतेसमोर !
By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST