कोल्हापूर : यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या मागे लागला आहे. बॅँकांच्या वतीने १०४८ कोटींचे वाटप खरिपासाठी केले असून ९०० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. ‘महाबीज’नेही बियाणे पुरविण्याची तयारी केली आहे. त्यांच्याकडे ६७१२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. गतवर्षी पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला होता. भात, भुईमूग, सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. यंदा पाऊस दमदार कोसळणार, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत. सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅँकांनीही खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात २ लाख ५० हजार २५८ शेतकरी खरीप कर्जासाठी पात्र आहेत. जिल्हा बॅँकेला १ हजार कोटी खरीप कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी सुमारे ८०० कोटींचे वाटप बॅँकेने केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांना ९९८ कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यांपैकी २४६ कोटींचे वाटप केले आहे. ‘महाबीज’ने बियाण्यांची तयारी केली असून कृषी विभागाने तब्बल २६ हजार ८१० क्विंटल बियाण्यांची मागणी ‘महाबीज’कडे केली होती. त्यापैकी महाबीजने जिल्ह्यासाठी ९०९० क्विंटल बियाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ६७१२ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले.
जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी १०४८ कोटींचे वाटप
By admin | Updated: May 12, 2016 00:58 IST