कोल्हापूर : केंद्रात, राज्यात सत्तेत व महापालिकेतही युती असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच खडाखडी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत या निवडणुकीसाठी युती झालीच, तर जागावाटपासून अनेक मुद्द्यांवर कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.कोण बरोबर आले तर त्यांना घेऊन; अन्यथा स्वबळावर, अशी डरकाळी भाजपने फोडल्यावर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही त्याला बुधवारी झालेल्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले. अधिवेशन यशस्वी झाले म्हणजे महापालिका निवडणूक जिंकता येत नसल्याची टीकाही आमदारांनी भाजपवर केली आहे.केंद्रात, राज्यात भाजपने जोरदार यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपचे कमळ सगळीकडे उमलले. त्यामुळे आता महापालिकेतही कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या पक्षाच्या संपर्कात आहेत. देशाला अजून नसले तरी किमान भाजपला तरी ‘अच्छे दिन’ आले असल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळेच आपला पारंपरिक सोबती असलेल्या शिवसेनेला आव्हान दिले जात आहे. आमदार क्षीरसागर यांच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा पाया मजबूत करण्याची संधी आहे. क्षीरसागर आमदार झाल्यापासूनची ही महापालिकेची दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला तोंड देत असतानाच त्यांना पुन्हा मित्रपक्ष असलेल्या भाजपशीही लढावे लागत आहे. त्याची महत्त्वाची दोन-तीन कारणे आहेत. मुळात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यामध्ये तितकेसे चांगले संबंध नाहीत. पाटील यांच्या स्वीय साहाय्यकास क्षीरसागर समर्थकांकडून मारहाण झाल्यापासून हा वाद सुरू झाला. त्यात विधानसभेला भाजपच्या महेश जाधव यांना चाळीस हजारांवर मते मिळाल्याने क्षीरसागर पुन्हा अस्वस्थ झाले; कारण त्यांच्या पारंपरिक मतपेटीतूनच जाधव यांनी ही मते घेतली होती. त्यात विभागणी झाल्याने त्यांना एका टप्प्यावर विजयासाठी झगडावे लागले. टोलमुक्ती आंदोलनात आमदार क्षीरसागर सुरुवातीपासूनच पुढे आहेत; परंतु आता त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत आहे. पालकमंत्री पाटील ‘एमएच-०९’ वाहने टोलमुक्त करण्याचा प्रस्ताव मांडतात व त्याला क्षीरसागर लगेच विरोध करून रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात, हेदेखील धुसफुशीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा साचलेल्या घडामोडी या दोन पक्षांची महापालिकेत युती करताना आड येत आहेत. त्यात बुधवारी (दि. १०) क्षीरसागर यांनी थेट भाजपच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढविल्याने त्याचीही दखल भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. त्या संदर्भात भाजपने थेट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे ठरविले असले तरी भाजपच्या अधिवेशनावर टीका करण्याचा क्षीरसागर यांना अधिकार व गरजही नव्हती, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. भाजपने युती करावी की नाही, हे ठरविण्याचे अधिकार पालकमंत्री पाटील यांना आहेत; परंतु शिवसेनेत तसे अधिकार आमदार क्षीरसागर यांना स्थानिक पातळीवर नाहीत. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. त्यामुळे युतीवरून एकमेकांना शड्डू मारणे संयुक्तिक नाही, असे भाजपला वाटते. (प्रतिनिधी)कोल्हापूर ‘उत्तर’ मतदारसंघातील २०१४ मधील मतदानआमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना): ६९ हजार ७३६सत्यजित कदम (काँग्रेस): ४७ हजार ३१५महेश जाधव (भाजप): ४० हजार १०४आर. के. पोवार (राष्ट्रवादी): ९ हजार ८८७रघू कांबळे (भाकप): १५०४सुरेश साळोखे (मनसे): १२८०डी. श्रीकांत (बसप): ११२० स्वबळावर लढण्याची भाजपची भाषाशिवसेनेचे या भाषेला प्रत्युत्तरअनेकजण भाजपच्या संपर्कातक्षीरसरसागर व पाटील यांच्यात वाद
युतीमध्ये ‘नमना’लाच खडाखडी
By admin | Updated: June 12, 2015 00:02 IST