कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. पालिकेतील नगरसेवक व लोकप्रतिनिधींकडून स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. आता तर चक्क येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचाही त्यांना विसर पडला असल्याचा प्रकार रविवारी घडला.दि. ९ आॅगस्ट हा क्रांतिदिन म्हणून रविवारी सुटीचा दिवस असून देखील सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र कऱ्हाड पालिकेकडून निव्वळ पाचजणांच्या उपस्थितीत येथील हुतात्म्यांना अभिवादन करत हुतात्मा दिन साजरा केला. रविवारचा दिवस सुटीचा असल्याने अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी देखील उपस्थिती लावत हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे कर्तव्यता दर्शवली नाही. तसेच एकाही नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली नाही.हुतात्मा दिनादिवशी नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत रोडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भानुदास पाटील, हिंदुराव जाधव व नगरवाचनालयाचे ग्रंथपाल संजय शिंदे यांच्या उपस्थितीत येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागा संपादन करून राज्यात २६८ ठिकाणी शासकीय खर्चाने अशी स्मारके उभारण्यात आली. त्या योजनेअंतर्गंत कऱ्हाडच्या दक्षिणेकडे पुणे-बेंगलोर महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवा रस्त्याजवळ रिमांड होम परिसरात स्वातंत्र्यलढ्यात वीरगती प्राप्त केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्मारकाच्या पाठीमागील बाजूस असलेली भिंत पडली असून, स्मारक परिसरात गवत वाढल्याने कमानीलाही गंज चढला आहे. वर्षातून स्मारक १५ आॅगस्ट व २६ जानेवारी, ९ आॅगस्ट, हुतात्मा दिन अशा दिवशीच खुले ठेवले जाते. इतर दिवशी बंद ठेवले जाते. स्मारक बंद ठेवल्याने काय होते, याची साक्ष स्मारकामधील बंद असलेल्या गेट व त्यावरील गंजलेली साखळी व कुलूपच देत आहे. (प्रतिनिधी)राजकारण्यांची उदासीनता सिद्ध !हुतात्मादिनी येथील हुतात्मा स्मारकातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात एकही नगरसेवक तसेच लोकप्रतिनीधींने धन्यता मानली नाही. हुतात्मा स्मारकाबाबत तसेच शहरातील विविध समस्यांबाबत पालिकेच्या मासिक सभेत सभागृहात आवाज उठविणाऱ्या नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक हुतात्मादिनी उपस्थित राहिला नाही. ज्यांनी खरोखरच हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मारकाबाबत राजकारण्यांकडून उदासीनता पाळली जात असल्याचे स्थानिकांतून सांगितले जात आहे.दीड लाख रुपये निधी टाकूनही काम अपूर्णच.....कोल्हापूर नाका या ठिकाणी बांधण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेकडून प्रत्येकवर्षी हुतात्मा स्मारकावर करण्यात येणाऱ्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. २०१३-१४ वर्षी ५० हजारांची तरतूद पालिकेने केली होती. तर यावर्षी २०१५-१६ वर्षी दीड लाखाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एवढ्या रकमेची तरतूद करूनही स्मारकाचे काम अजूनही ठप्प आहे.
स्मारकानंतर आता अभिवादनाकडेही दुर्लक्ष!
By admin | Updated: August 10, 2015 21:13 IST