मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण
अनिल पाटील
मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड येथे सुरू असलेल्या केंद्रावर वर्षभरात पन्नास हजारावर गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे .
सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान सर्वत्र हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू होताच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर व प्रमुख शहरात विस्तार करण्यात आला. या उपक्रमाचा लॉकडाऊनच्या कालावधीत गरजूंना चांगलाच फायदा झाला.
या थाळीने हजारो लोकांची भूक भागविली. गरजूंना, नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना हा विकास आघाडी सरकारकडून २६ जानेवारी २०२० पासून राबविण्यात येत आहे. दहा रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाकडून शहरी आणि ग्रामीण भागांसाठी प्रतिथाळी अनुदान दिले जाते.
या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशा वेळी लोकांची उपासमार होऊ नये यासाठी येथील श्री गणेश हॉटेल शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज १५० थाळ्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. लोकांना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड केंद्रावर १२ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२१ अखेर ५० हजारांवर व्यक्तीनी याचा लाभ घेतला.