मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) ८,१00 कर्मचारी चालू आर्थिक वर्षात निवृत्त होत आहेत. त्यामुळे ७२00 पदांची भरती करण्याची तयारी बँकेने चालवली आहे.स्टेट बँक आॅफ इंडिया ही भारतातील सर्वांत मोठी बँक आहे. बँकेने तंत्रज्ञानविषयक अवलंबित्व वाढविण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे. दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा सहभाग वाढविला जाणार आहे. एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांना सहाय्य होईल, अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान बँकेत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सहजपणे आणि कमी वेळात पार पडतात. तसेच त्यासाठी मेंदूला फार ताण देण्याचीही गरज नाही. उदा. नोटा मोजण्याचे मशीन अल्पावधीत नोटा मोजून देते. या मशीनमुळे कॅशिअरचा वेळ आणि कष्ट वाचतात. भट्टाचार्या यांनी सांगितले की, बँक शाखांमध्ये रोख रकमेचा भरणा करण्यासाठी ‘कॅश डिपॉजिट मशीन’ बसविण्याची आमची योजना आहे. सध्या हे काम कर्मचारी करतात. त्यासाठी प्रत्येक शाखेत टेलर काऊंटर आहेत. या काऊंटरांवर मोठा कर्मचारी वर्ग बँकेला तैनात करावा लागतो. कॅश डिपॉजिट मशीन बसविल्यानंतर हे मनुष्यबळ बँकेला इतरत्र वळविता येईल. याशिवाय कॅश रिसायकल मशीन आणण्याचाही बँकेचा प्रयत्न आहे. ही यंत्रे डिपॉजिट केलेल्या नोटा लगेच एटीएम मशीनला पुरवितात. हे काम आॅटोमेटिक होते. याशिवाय खऱ्या आणि खोट्या नोटा ओळखण्याची क्षमताही या मशीनमध्ये आहे. भरणा केलेल्या रोख रकमेत असलेल्या बनावट नोटा हे मशीन नाकारून बाहेर फेकते. तसेच ग्राहकाने केलेल्या भरण्यातून तेवढी रक्कम वजाही करते. अशा प्रकारची ४,५00 रिसायकल यंत्रे बँक खरेदी करेल. एसबीआयचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जे.एन. मिश्रा यांनी सांगितले की, संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीलाच सध्या मनुष्यबळाची चणचण भासत आहे. त्यातल्या त्यात सरकारी बँकांत अधिक मनुष्यबळ टंचाई आहे. २0२0 पर्यंत अ. जनरल मॅनेजर दर्जाचे ७५ टक्के अधिकारी निवृत्त होत आहेत. बँकांना मोठे मनुष्यबळ लागणार आहे. एसबीआयने १,८३७ प्रोबेशनरी अधिकारी आणि ५,४00 सहायक अधिकारी भरण्याची तयारी चालविली आहे. (प्रतिनिधी)
एसबीआयची महाभरती; यंदा ७,२00 पदे भरणार
By admin | Updated: June 16, 2014 22:54 IST