औरंगाबाद : चित्रपट, टीव्ही मालिका व आजूबाजूच्या वातावरणाचा मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो त्याचा प्रत्यय इंदिरानगर, गारखेडा परिसरातील दोन कुटुंबांना चांगलाच आला. अवघ्या १०-११ वर्षांच्या दोन्ही बालकांनी ‘मुंबई जाकर हम दादा बनिंगे... वहाँच बडे बनेंगे’ असा विचार करून ते गुपचूप रेल्वेने मुंबईला पळून गेल्याची घटना ५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. त्याचे झाले असे की, इंदिरानगर, गारखेडा परिसरातील रहिवासी शेख शाहरुख यांचा १० वर्षांचा मुलगा शेख आदिल व शेख अनिस यांचा ११ वर्षांचा मुलगा शेख मेहराज हे दोघे जण मित्रांसोबत खेळायला जातो म्हणून गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. आदिल व मेहराज हे दोघे जण जिवलग मित्र. दोघेही यंदा ५ वीत गेले आहेत. दोघांच्या शाळा वेगवेगळ्या असल्या तरी एकाच वसाहतीत राहत असल्यामुळे ते दोघे सतत सोबत राहायचे. गुरुवारी सकाळी खेळता खेळता दोघांनी येथून मुंबईला पळून जाण्याचा विचार केला. ‘मुंबईत जाऊ. तेथे काहीही कामधंदा करून मोठे होऊ. मुंबईचे आपण दादा बनून पैसे कमवू’ असा विचार केला व रेल्वेने बसून कल्याण गाठले. कल्याण रेल्वेस्टेशनवर ते दोघेही उतरले. तेव्हा त्यांना तेथील पोलिसांनी हटकले. तेव्हा आमचे आई-वडीलही येथेच झोपले आहेत, अशी थाप मारून ते निसटले. रात्रभर ते कल्याण रेल्वेस्टेशनमधील एका प्लॅटफॉर्मवरच झोपले. तिसऱ्या दिवशी मात्र, त्यांची वाईट अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी परत औरंगाबादकडे जाणारी रेल्वे पकडली. दुर्दैव असे की, मेहराजला नेमकी त्यावेळी तहान लागली अन् तो खाली उतरला. तेवढ्यात रेल्वे निघाली. आदिल शेख हा सुखरूप औरंगाबादला आपल्या आई- वडिलांकडे पोहोचला. मेहराजच्या शोधार्थ त्याचे आई- वडील कल्याणकडे रवाना झाल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे जमादार आर. डी. नरवडे यांनी दिली.
‘दादा’ होण्यासाठी दोन मुलांनी गाठली मुंबई
By admin | Updated: June 10, 2014 14:13 IST