जळगाव : कोरोनाची दुसऱ्या लाट काहीशी ओसरल्यानंतर गेल्या महिनाभरात जळगाव शहरात विविध राज्यातून २ हजाराहून अधिक प्रवासी आले आहेत. रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेल्या तपासणीत यामध्ये चार प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक व गोवा या राज्यातून रेल्वेने महाराष्ट्र येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी करण्याचे एप्रिल महिन्यापासून आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगाव मनपा आरोग्य विभागातर्फे पर राज्यातून जळगाव शहरात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आरोग्य पथक नियुक्त केले आहे. २४ तास हे पथक स्टेशनवर कार्यरत असते. प्रत्येक प्रवाशाची अँटिजन चाचणी करून स्टेशनच्या बाहेर सोडण्यात येत आहे. या मध्ये जो प्रवासी कोरोनाबाधित आढळून येईल, त्याला तत्काळ कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर इतर प्रवाशांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात येत आहे.
मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जून ते २ जुलैपर्यंत जळगाव रेल्वे स्टेशनवर विविध परराज्यातून २ हजार १०० प्रवासी जळगावात आले आहेत, यामध्ये चार प्रवासी हे कोरोना बाधित आढळून आले आहेत. यातील तीन प्रवासी गुजरातहून तर एक प्रवासी हा मुंबईहून आला असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
आतापर्यंत आढळले ५७ प्रवासी पॉझिटिव्ह
मनपा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार विविध परराज्यातून रेल्वेने जळगावात आतापर्यंत ४ हजार ३४० प्रवासी आले आहेत. यामध्ये ५७ प्रवासी हे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर यात मे महिन्यात सर्वाधिक ३७ प्रवासी हे कोरोना बाधित आढळून आले असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
एप्रिल महिन्यापासून जळगाव रेल्वे स्टेशनवर परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यासाठी मनपाचे आरोग्य पथक २४ तास या ठिकाणी कार्यरत आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी करण्यात आम्हाला यश आले आहे.
डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा