लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरामध्ये वाढत्या खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार उद्भवत आहे. सर्वसामान्य जळगावकरांचे खड्ड्यांमुळे जगणे मुश्किल झाले आहे. सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या वेळेस शहराचा कायापालट करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येऊन दोन वर्षे उलटली तरी भाजपला खड्ड्यांच्या दुरुस्तीचा विसर पडला आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ राष्ट्रवारी काँग्रेसच्यावतीने बुधवारी चक्क खड्ड्यांमध्ये केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.
बुधवारी दुपारी हे आंदोलन राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षणचे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी अशोक लाडवंजारी, कैसर काकर, ममता तडवी, पंकज नाले, विशाल देशमुख, जयेश पाटील आदींचा आंदोलनात सहभाग होता.
कायापालट तर सोडाच साधे खड्डे दुरुस्तीही नाही...
आमदार सुरेश भोळे यांनी निवडणुकीच्या वेळेस ‘चीड येते का खड्ड्यांची’ असे घोषवाक्य तयार केले होते. मात्र, भाजपची सत्ता येऊन दोन वर्षे उलटून गेले तरी सत्ताधारी भाजपला खड्ड्यांचा विसर पडला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीसुध्दा आम्हाला फक्त शंभर दिवस सत्ता द्या, आम्हीच शहराचा कायापालट करतो असे सांगितले. मात्र, कायापालट तर सोडाच साधी खड्ड्यांची दुरुस्तीही झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे.