जळगाव : पाण्याच्या नळीने गळफास घेऊन जितेंद्र रमेश पाटील (वय २५,रा.चाळीसगाव) या तरुणाने अजिंठा चौकातील हॉटेल महाराजामध्ये आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक किशोर महाजन व कामगार सकाळी १० वाजता हॉटेल उघडायला गेले असता तेथे पाणी भरण्याच्या पिवळ्या नळीने जितेंद्र याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. जितेंद्र हा एक वर्षापासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. पोलिसांनी आधारकार्डावरुन त्याची ओळख पटविली. त्याच्याकडे मोबाईल किंवा सुसाईड नोट काहीच नव्हते. त्याला दारुचे व्यसन असल्याचे सांगण्यात आले. या हॉटेलमध्ये तो एकटाच मुक्कामाला रहात होता. तो अविवाहित होता. त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या पश्चात आई लिलाबाई, मोठा भाऊ राजेंद्र, बहिण वैशाला असा परिवार आहे. दुपारी कुटुंबिय आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. तपास रतिलाल पवार करीत आहेत.