जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे सत्र ऑगस्ट २०२१ साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच रविवारी अखेरचा दिवस असून या सुटीच्या दिवशीही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून कळविण्यात आले आहे.
१५ जुलैपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. १५ ते ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन ७ सप्टेंबरपासून प्रथम फेरी प्रवेशाला सुरुवात झाली. प्रथम फेरी प्रवेशाची ११ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, ती एक दिवसाने वाढवून देण्यात आली असून रविवारीसुद्धा प्रवेश घेता येणार आहे़ शहरातील शासकीय आयटीआयमधील ९४० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीसाठी आलेल्या अर्जांपैकी ८९१ विद्यार्थ्यांची प्रथम फेरीसाठी निवड झाली होती. त्यापैकी आतापर्यंत २९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना रविवारीसुद्धा प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होऊन दुसरी प्रवेश फेरी राबविली जाईल.