लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अजूनही काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण राहिले असून ते पूर्ण करण्यासाठी आता कसरत सुरू आहे. महिनाभरात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पुर्व चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन शाळा व महाविद्यालयांनी आखले असल्याचे मुख्याध्यापक व प्राध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे मार्च-२०२० मध्ये शाळा व महाविद्यालय बंद झाली. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शासनाकडून ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली. दुसरीकडे अभ्यासक्रम सुध्दा कमी केला. गेल्या महिनाभरापासून दहावी ते बारावीच्या वर्गांना सुरूवात झाली आहे. काही शाळांचे ऑनलाईन शंभर टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येवू नये म्हणून पुन्हा अध्यापनाला सुरूवात करण्यात आली आहे. काही शाळा, महाविद्यालयांचे दहा ते वीस टक्के अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत सुरू आहे. मे महिन्यात परीक्षा होणार आहे. मात्र, अद्याप कुठलीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परीक्षांच्या तारखा जाहीर करण्याची मागणी होत आहे.
०००००००००००००००००००००
दहावीचा अभ्यासक्रम
- यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले तरी इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.
------------------
बारावीचा अभ्यासक्रम
यंदा कोरोनामुळे बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटीक्स आदी विषय प्रत्यक्ष वर्गात शिकविले जात आहेत. त्यामुळे प्राध्यापकांकडून अभ्यासक्रम पूर्ण करून पूर्व चाचणी घेतली जाणार आहे.
०००००००००००००००००००००००००००००००
मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिक्रिया
कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण एकदा अभ्यास व्हावा म्हणून पुन्हा अध्यापन केले जात आहे. त्यानंतर पूर्व परीक्षा घेतली जाईल.
- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक
--------------------
बारावीचा तीस टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. सत्तर ते एैंशी टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम हा महिनाभरात पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची सराव चाचणी परीक्षा घेतली जाईल. मे महिन्यात परीक्षा असली तरी तारखा जाहीर झाल्या नाहीत़ त्या जाहीर होणे अपेक्षित आहेत.
- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य
०००००००००००००००००००००००००
- विद्यार्थी प्रतिक्रिया
कोरोनामुळे सुरूवातीला ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यात आले. मात्र, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्ष शिकविल्यामुळेच चांगले स्मरणात राहतात. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत आहे.
- आशिष पाटील, विद्यार्थी
------------------------------
परीक्षा जवळ आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिनाही उलटेल. अधिक चांगला अभ्यास व्हावा म्हणून घरी सुध्दा अभ्यासाला जादा वेळ देत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत होत आहे.
- रोहित सोनवणे, विद्यार्थी