जळगाव : तालुक्यातील म्हसावद बोरनार गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. वडली ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचा धुराडा उडाला असून सरपंच सचिन पाटील, त्यांची आई विमलबाई हे स्वत: पराभूत झाले असून त्यांच्या पॅनलला फक्त १ जागा मिळाली आहे. प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने ९ पैकी ८ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे.
म्हसावद ग्रामपंचायतीच्या १७ जागांमध्ये भूषण चिंचोरे यांच्या नम्रता पॅनलला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. मात्र, सत्ता कोणाची एकाची आलेली नाही. त्याशिवाय येथे अपक्षांनीही बाजी मारली आहे. शिवसेनेचे विजय आमले यांच्या दोन्ही जागा पराभूत झाल्या आहेत. म्हसावदप्रमाणेच बोरनारमध्येही संमिश्र जागा मिळालेल्या आहेत. जवखेडा येथे माजी सरपंच धैर्यसिंग पाटील यांच्या पॅनलच्या ५ जागा विजयी झालेल्या असून एक जागा ईश्वर चिठ्ठीने विजयी झालेली आहे. धैर्यसिंग हे देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मानले जातात. या गटात शिवसेनेचा धुराडा उडालेला आहे.
वावडदा येथे रवी कापडणे यांनी सलग चौथ्यांथा सत्ता मिळवली आहे. ९ पैकी ६ जागांवर कापडणे यांचे उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी राजेश वाढेकर, रवींद्र चव्हाण यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. वडली येथे रामचंद्र पाटील, संभाजी पाटील, धनराज पाटील व अरुण पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. ९ पैकी ८ उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत.