ग्रामपंचायतीने संबंधित विभागांना गेल्या वर्षभरापासून पत्रव्यवहार करून विविध समस्या मांडलेल्या आहेत, त्यात बसस्थानकावरील मुतारी बांधणे, शेत रस्ता तयार करणे, रस्त्याची कामे अपूर्ण असल्यामुळे रस्त्याचे पाणी दलीत वस्तीकडून गावात जाते. तेथे पाइप टाकून रस्ता तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता तयार करणे, रस्त्यामुळे उंचावर गेलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांसाठी रस्ता तयार करणे, विष्णुदास महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता पाइप टाकून तयार करणे, नांद्रा बसस्थानक व माध्यमिक विद्यालयाजवळ गतिरोधक बनविणे, गावातील गट नं.३८९/२ मधून संबंधित कंपनीने मोठ्या प्रमाणावर मुरूम उचललेला आहे. त्या ठिकाणी खराब मटेरियल आणून टाकले आहे ते उचलून नेणे, गावाजवळील ५०० मीटर रस्ता हा वळण व शेती अधिग्रहणामुळे अपुरा आहे. तो विषय मार्गी लावावा, अशा असंख्य समस्या दूर करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थ २८ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. या बाबतीतील निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी जळगाव, आमदार किशोर पाटील पाचोरा, भडगाव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग धुळे, पोलीस निरीक्षक पाचोरा यांना देण्यात आले आहे.
नांद्रा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या दूर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST