यावल : यावर्षी झालेल्या पावसाने तालुक्याची सरासरी गाठली आहे.
यावलमध्ये झालेला पाऊस समाधानकारक असला तरी गेल्या १५ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिपावसाने कपाशीची लाल पडून पानगळ झाली आहे. लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे बोंडे गळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तसेच सतत पावसामुळे उडीद, मुगाचेही तीन-तेरा वाजले, तर सोयाबीनच्या शेंगाना अंकुर फुटल्याने उंबरठ्यावरील सोयाबीन गेले आहे. यावल तालुक्याची पावसाची सरासरी ६०० मिलीमीटर एवढी आहे.
मंगळवार, दि. २१ सप्टेंबरपर्यंत ५९४.१४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांची आशा भरड धान्यावर आहे. येत्या १५ दिवस तरी पावसाने उघडीप द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.