शहरातून जाणाऱ्या आशिया महामार्ग ४६वर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जात असतात. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता ओलांडून पादचारी, दुचाकीस्वार हे जात असतात. पण भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नसल्याने दिवसाआड अपघात होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे जीव जात आहे. या महामार्गावर ठरावीक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा व निवेदन प्रकल्प संचालक भारतीय राजमार्ग प्राधिकरण जळगाव यांना अनुष्ठान यांनी दिले.
गतिरोधकअभावी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. १० रोजी किसान महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वारास भरधाव येणाऱ्या टँकरने चिरडले. त्या अपघातात निष्पाप तरुणाचा बळी गेला. असे दिवसाआड अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात किसान महाविद्यालय, ग्रीन पार्क हॉटेल, महावीर नगर कॉर्नर, बसस्थानकच्या दोन्ही बाजूना, कुटीर रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ याठिकाणी तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान यांनी केली आहे.