लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेतील विविध पदांवरील ४० अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतीच ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र, ग्रामपंचायत विभागाच्या संथ कारभारामुळे ग्रामसेवकांच्या पदोन्नत्यांचा विषय रखडलेलाच असून आता यातील एक ग्रामसेवक अपिलात गेल्यामुळे यात संभ्रमाव्यस्था निर्माण झाली आहे.
तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून हा विषय रखडवत ठेवला होता. मात्र, सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभांमध्ये या विषयावर वादग्रस्त चर्चा झाल्यानंतर अखेर महिनाभराने सभेच्या आदल्या दिवशी बाळासाहेब बोटे यांनी ग्रामसेवकांच्या पदोन्नतीसंदर्भातील फाईल सादर केली होती. मात्र, त्यातही पूर्तता नसल्याने सामान्य प्रशासनाकडून ही फाईल परत पाठविण्यात आली होती. बरेच दिवस कर्मचाऱ्यांच्या अभावी ही फाईल पडून होती. त्यातच सेवाज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून एक ग्रामसेवक अपिलात गेल्याने आता नेमके पुढे करायचे काय, हा प्रश्न ग्रामपंचायत विभागाला पडला आहे. त्यातच या विभागाचा प्रभारी कार्यभार हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर. लोखंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधीच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांचा कार्यभार आहे.
अशा झाल्या पदोन्नती
सामान्य प्रशासन विभागाकडून यंदा कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी म्हणून ५, वरिष्ठ सहायक ते कनिष्ठ प्रशासन अधिकारी १६, कनिष्ठ सहायक ते वरिष्ठ सहायक १९ अशा ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या आहेत.