लेखक- बापू हटकर, धुळे.
नार- पार गिरणा जोड ही मूळ कल्पना भाऊसाहेब हिरे यांच्या स्वप्नातील योजना आहे. त्यात मांजरपाडा एक-दोन असे काही नव्हतं. सरळ योजना होती. नार-पारचे पाणी गिरणेत आणून सोडायचे. गिरणा, पांझरा, बोरी नदीत सोडून या अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी, नागरिकांना पिण्यासाठी आणि उद्योगासाठी पाणी पुरवावे.
पण मध्येच सरकारने गिरणा खोऱ्याला द्यायचे ठरविले आणि हे पाणी गोदावरी खोऱ्यात न्यायचे ठरविले. त्याविरुद्ध कसमादेना पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले. मग त्यांना शांत करण्यासाठी सरकारने एक युक्ती काढली. त्यांनी मांजरपाडा -१ आणि मांजरपाडा -२ अशा दोन योजना मांडल्या. ही धरणे एकाच वेळी बांधली जातील, असे आश्वासन तत्कालीन जलसंपदामंत्री यांनी दिले. त्यानुसार गोदावरी
खोऱ्यासाठी मांजरपाडा -१ मध्ये ७० टीएमसी पाणीसाठा होईल, असे धरण बांधावे आणि गिरणा खोऱ्यासाठी मांजरपाडा -२ हे ५० टीएमसी पाण्याचे धरण बांधायचे ठरले. खरे तर पाण्याचे हे वाटप अन्यायकारक आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी विपुल आहे. उत्तरेकडील दोन तीन तालुके तुटीच आहेत. तर इकडे गिरणा, मोसम, पांझरा, बोरी या नद्या पूर्ण कोरड्या आहेत. हे वाटप ५०-७० टीएमसी असायला हवे. पण ते
७०-५० टीएमसी असे झाले. तेही आंदोलकांनी स्वीकारले.
आता मांजरपाडा -१ हे धरण ९९टक्के पूर्ण झाले आहे तर मांजरपाडा -२ या धरणावर, एक वीट, मूठभर सिमेंट, आणि पसाभरसुद्धा खडी वाळू आली नाही. असे का झालं? मांजरपाडा -१ पूर्ण झालं? तरी मांजरपाडा-२ वर कामाची सुरुवात का झाली नाही? आपल्याला पाणी द्यायचे नाही? हे सरकारने आधीच नक्की केलं होतं. यावर आंदोलन झाले. पुढे कामात अडथळा नको म्हणून सरकारने ही शक्कल लढवली. मांजरपाडा एक आणि दोन. एक नंबर पूर्णत्वास गेले आहे. तरी आपण झोपेत आहोत.
तुमच्याघरात लहान मूल आहे. घरी पाहुणे येतात. मुलाला प्रेमळ पाहुण्यांचा लळा लागतो. पाहुणे गावी निघतात. तुम्ही त्यांना सोडायला मुलासह बस स्टॅंडवर जाता. पाहुण्यांची बस येते. पाहुणे बसमध्ये चढतात. मुलगा पाहुण्यासोबत जायचा हट्ट करतो. तुम्ही त्याला सोडत नाही. मग तुम्ही त्याची समजूत घालता. बेटा, आपण मागून एक बस येत आहे. या बसने आपण जाऊ!
मांजरपाडा - २ ही अशीच मागची बस आहे. आपण गप्पगार घरात बसून राहिलात तर मागची बस कधीच येणार नाही. यावर
एकच मार्ग आहे, मांजरपाडा -२ सुरू करा. म्हणून आंदोलन तर करावच लागेल. त्यातून सुटका नाही. पण त्या आधी दुसरं आंदोलन उभं करा. मांजरपाडा -२ पूर्ण होईपर्यंत, मांजरपाड -१ मधील निम्मे पाणी गिरणेत सोडा. आमचे धरण पूर्ण होईपर्यंत मांजरपाडा- १ मधून आम्हाला निम्मे पाणी द्या. तसचं पाण्याचं वाटप ७० टीएमसी पाणी आम्हाला आणि ५० टीएमसी तुम्हाला अशी मागणी करावी लागेल. मग ते म्हणतील ६०-६० टीएमसी घेऊ. इथं तर आमचंच तोंड दाबून बुक्क्यांचा मुकामार सुरू आहे.
लाठी काठी खाएंगे।
नारपार लाएंगे।।
धोंड्या धोंड्या पानी दे।
नारपार आमले दे।।