लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रावर जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या आपत्तीतून सावरण्यासाठी सरकार काम करीत आहे. यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहे. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली असल्याची घणाघाती टीका पाणीपुरवठामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरातील लेवा भवन येथे अपंगांना साहित्यवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी ही टीका केली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. या आपत्तीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आरोप-टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो. मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेतेदेखील पार पाडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.