जळगाव : तू जर पोलिसांना माहिती पुरविली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आकाश राजेंद्र पवार (२१, रा़ श्रीकृष्णनगर, गोपाळपुरा) या तरुणाला तिघांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता श्रीकृष्णनगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश पवार हा तरुण श्रीकृष्णनगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याचे बालाजी किराणा नावाने दुकान असून त्यावर उदरनिर्वाह करतो. बुधवारी रात्री ९ वाजता आकाश हा दुकानात असताना, तुषार राजेंद्र पाटील, अमोल राजेंद्र पाटील व सागर राजेंद्र चौधरी हे तिघे त्याठिकाणी आले आणि तू पोलिसांना माहिती का पुरवितो अशी विचारणा केली. त्यावर आकाशने आपण कुठलीही माहिती पुरवित नसल्याचे सांगितले. याचे वाईट वाटून तिघांनी आकाशला मारहाण केली. सागर चौधरी याने काठीने त्याच्या कानावर व पाठीवर जबर मारहाण केली. नंतर तू जर पोलिसांना माहिती पुरविली तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी तिघांनी धमकी दिली. अखेर याप्रकरणी आकाश पवार या तरुणाच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.